माणूस इतिहास का वाचतो ?
पूर्वजांच्या चुका टाळण्यासाठी !
पण नाही !
कारण, आजही,
काळाची इतकी पाने उलटल्यावर,
आणि रोज इतिहासात भर टाकल्यावरही,
माणूस चुका करतो -
केवळ नव्याच नाही; तर जुन्याही.
मग माणूस इतिहास का वाचतो ?
आपल्या चुकांना आधार शोधण्यासाठी -
'श्रेष्ठ' पूर्वजांच्या चुकांचा…
पण शेवटी हे चूक - बरोबर व्यक्तिसापेक्षच
आणि जे कालनिरपेक्ष असत नाही,
ते अंतीम सत्यही असत नाही.
कारण बदलत्या काळाबरोबर,
बदलत्या संस्कृतीबरोबर,
चूक - बरोबरच्या व्याख्या बदलतात.
काळ मात्र वाहतच असतो…
आणि म्हणूनच,
पहिल्यानंतर दुसरे महायुद्ध होते
आणि तिसऱ्याची जमवाजमव सुरू होते.
यासाठी मात्र इतिहासाची पाने
परत परत चाळावी लागतील.
तरीही या चुकीला आधार मिळणार नाही…
होय, ही निःसंशय चूकच !
कारण या चुकीनंतर
उरतील ना माणसे,
ना उरेल आपल्यासाठी काळ.
आणि म्हणूनच ही चूक
व्यक्तीसापेक्ष असणार नाही,
तर असेल कालनिरपेक्ष अंतीम चूक !
माणूस इतिहासातून खरंच काही शिकतो का ?
Liked Itihass a lot, Well written (Arpatim)
उत्तर द्याहटवा