जेव्हा लिखाणात लुडबुड सुरू केली तेव्हा केवळ मनात आलेले कागदावर उतरवणे एवढाच मर्यादित आवाढा होता. पण लिहित गेले तशी चुकत-माकत, कधी गरजेपोटी, कधी एखादे वेगळे तंत्र वापरुन बघण्यासाठी तर कधी जे लिहित होते त्याची गरज म्हणून थोडं फार या तांत्रिक अंगाचे वाचनही करत गेले.
ही कथा लिहिली ती एक समस्या डोक्यात होती ती कथेचं रुप घेऊन आली म्हणून. पण मागे बघून विचार करता आता ती नुसती लांबीने मोठी कथा नाही तर माझ्यासाठी ती एक दीर्घकथा आहे. रोज एक भाग इथे लिहायचा असा विचार आहे. संपूर्ण कथा लिहून झाली की मला ती दीर्घकथा का वाटते याचे कारण देण्याचा प्रयत्न करीन. तुमचेही मत सांगा.
नवी पहाट
- १ नव्या वादळाची चाहूल -
- १ नव्या वादळाची चाहूल -
डॉ. जोशींची अपॉईंटमेंट घेतली खरी, पण वसुंधरा मात्र तेव्हापासून आणखीच हळवी झाली होती. रात्री स्वयंपाकघरातलं सगळं आवरुन झाल्यावर ती झोपायला जायला वळली. सहज की काळजीने हे तिलाही सांगता आलं नसतं, पण नजर नकळत विप्लविच्या खोलीकडे वळली. खोलीत दिवा दिसला म्हणून वर बघायला गेली तर तिचं पिल्लू वाचता-वाचता टेबलवर डोकं टेकून तसंच झोपलं होतं. तिला तसं झोपलेलं पाहून वसुच्या डोळयांत नकळत पाणी आलं. 'किती निरागस दिसतेय! पलंगावर, सोफ्यावर आडवं पडून वाचायचं नाही ही सुभाषने घालून दिलेली शिस्त इतकं सगळं होत असतानाही पाळते आहे!' हलक्या हाताने तिचे पुढे झेपावलेले केस मागे सारुन ती हळूच म्हणाली, "शोन्या, झोपायचं नाही का? वाचता-वाचता अशी झोपलीस तर मान अवघडेल ना…" सुदैवाने विप्लवि इतकी झोपेत होती की निमूटपणे उठली आणि पलंगावर आडवी झाली. "दात घासले का?" हा ओठांवर आलेला प्रश्न वसुंधराने गिळून टाकला. न वाद घालता झोपली हेच काय कमी होतं! तिनी झोपलेल्या विप्लविच्या अंगावर तिची आवडीची आजीच्या साडीची गोधडी घातली. हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवून, खोलीतला दिवा बंद करुन ती झोपायला आपल्या खोलीत गेली.
तिला वाटले सुभाष एव्हाना झोपला असेल. पण तो ही पुस्तक डोळ्यांसमोर धरून शुन्यात कुठेतरी नजर लावून बसला होता. त्याच्याकडे बघताना वसुला जाणवलं, त्याचे केस जरा जास्तच पांढरे दिसू लागले होते. तसे तर वयाच्या मानाने लवकरच पांढरे व्हायला लागले होते; पण ती वंशपरंपरागत मिळालेली देणगी होती. आता मात्र जास्त वेगाने पांढरे होण्याचे कारण तो वागण्या-बोलण्यातून जाणवू देत नसला तरी विप्लविची काळजी हेच होतं हे तिला मनोमन ठाऊक होतं.
"आज काय बाप-लेक दोघांनी पुस्तक समोर धरुन दुसरेच काहीतरी विचार करायचे असं ठरवलंय का? तुझी लाडकी लेक अशीच टेबलवर पुस्तक वाचता-वाचता त्यावर डोकं ठेवून कधी निजली तिलाही माहीत नसेल. तिच्या खोलीत दिवा दिसला म्हणून बघायला गेले तर बाईसाहेब तश्याच अवघडून झोपलेल्या! हळूच जागं केलं आणि पलंगावर झोपायला सांगितलं तर चक्क वाद न घालता झोपली!…" वसु बोलता बोलता थांबली कारण तिने पाहिलं तर सुभाषचं अजुनही लक्ष नव्हतं! म्हणजे ती खोलीत आली, कपडे बदलता-बदलता एकीकडे बोलत होती - त्याला काही पत्ताच नव्हता! पलंगावर बसून तिनी सुभाषच्या हातातलं पुस्तक काढलं आणि त्याच्या डोळ्यांवरचा चष्मा काढायला लागली तेव्हा कुठे त्याची तंद्री भंग पावली. "अरे, वसु, आज तुझं लवकर आवरलं!"
"माझं नेहमीच्याच वेळेला आवरलं, पण तू मात्र तुझी झोपायची वेळ उलटून गेली तरी जागा आहेस. अजुन उद्याचा दिवस ऑफिस आहे… अकरा वाजून गेले, अजुन तू जागा?"
सुभाष काहीच बोलला नाही; तसाच बसून राहिला होता. फक्त वाचताना लावलेला चष्मा तेवढा काढून ठेवला.
"विपूचा विचार करतो आहेस ना? डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेतल्यापासून तू असा हरवल्यासारखा झाला आहेस. का काळजी करतोस असं नाही म्हणणार मी, कारण काळजी तर माझ्याही डोक्यात सतत असते. पण अरे, तुला ऑफिसला जायचं असतं. तुझ्या डोक्याला दिवसभर कामाचे नाना व्याप. अशी सारखी काळजी करुन कसं चालेल? मला काही आता सकाळी उठून ऑफिस गाठायचं नाहिये! त्यामुळे आई-बाबांबरोबर गप्पा, कामं यात कसा वेळ जातो कळतही नाही! शिवाय आपलं पिल्लूही मोठं होतंय, त्यामुळे तिच्या मित्र-मैत्रिणी कोण, ती टि.व्ही.वर काय बघते, ऑनलाईन असते तेव्हा काय करते, होमवर्क होतोय ना, जेवण-खाण - एक ना दोन, किती गोष्टी असतात! स्वप्ना तिकडे अमेरिकेत राहून, दोघे नोकरी करुन दोन-दोन मुलं सांभाळते! कसं जमवते कुणास ठाऊक! मला झेपलंच नसतं!"
"त्याला कारण ती तुझ्यासारखी चिंतातूर जंतू नाहिये!"
"चला - बहिणीची बाजू घेण्याच्या निमित्ताने तरी बोललास आणि मुख्य म्हणजे आत्ता मी बोलत असताना चक्क तुझं लक्ष होतं माझ्याकडे!"
"वसु, मला फार काळजी वाटतेय गं विपूची… आज-काल माझ्याशी नीट बोलतच नाही. कधी कधी तर मी पाठीवर, खांद्यावर सहज हात ठेवला तर किंचाळते! मलाच भीति वाटते मग तिच्याजवळ जायची किंवा बोलायची. आपली विपू कुठे हरवली, वसु?" सुभाषने नकळत वसुंधराच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तिनी पाहिलं तर शेवटचं वाक्य बोलता-बोलता तो चक्क रडायला लागला होता. तसा पहिल्यापासूनच तो विपूबाबत हळवा होता; कदाचित लग्नाला बरीच वर्षं झाली, मूल होण्याची सगळी आशा सोडलेली असताना अचानक विप्लवि त्यांच्या आयुष्यात आली म्हणून असेल, कदाचित सगळेच वडिल मुलीच्या बाबतीत जास्तच भावूक असतात म्हणून असेल - कारण काहीही असलं तरी गेल्या दोन महिन्यांतल्या विपूच्या वागण्यातल्या बदलामुळे तो भांबावला होता हे तिला रोज दिसतंच होतं, पण आत्ता त्याने जे सांगितलं त्यावरुन परिस्थिती जरा जास्त गंभीर होती हे नक्की.
सुभाषच्या केसांतून हात फिरवता-फिरवता ती कधी त्याला थोपटायला लागली तिलाही कळले नाही. विपूच्या आधी दोघांत काही दोष नसताना मूल होत नाही म्हणून जे नैराश्य दोघांना आणि त्यांच्या प्रेमाला, त्यांच्यातल्या संवादाला ग्रासू पहात होतं तेव्हाची आठवण झाली तिला. मग विप्लवि आली आणि सगळंच एकदम बदललं! सुभाष तर विपूमध्ये इतका गुंतला की त्याला बाबा-मोडमधून बाहेर काढणे जिकिरीचं व्हायचं कधी-कधी! पण वसुंधराला बाप-लेकांतला हा जिव्हाळा, हे इतकं घट्ट नातं फार आवडायचं. अगदी तान्ही असल्यापासून, आई-बाबा ओळखता यायला लागल्यापासूनच, विपूला जरा जरी बरे नसले तरी तिला बाबा हवा असायचा आणि सुभाषही कसे मॅनेज करायचा कुणास ठाऊक, पण त्याने एकदाही 'आजचा दिवस काढून घे ना, वसु, खूप महत्त्वाची मीटिंग आहे. मी उद्यापासून थांबेन विपूजवळ" असं म्हटलं नाही!
वसुंधराची बॉंडिंग लीव्ह, तिची जमा झालेली सुट्टी, थोडी विदाऊट पे सुट्टी असं सगळं करुन आता कामावर हजर व्हायलाच पाहिजे, विप्लविला डे-केअरमध्ये ठेवायचं या कल्पनेनीच तिला रडायला यायला लागलं. शेवटी बरेच दिवस डोक्यात असलेले बोलूनच टाकावे म्हणून तिने सुभाषजवळ विषय काढला, "सुभाष, आपण परत जाऊया ना! मला इथे नाही विपूला वाढवायचं… आणि खरं सांगू? आपण आत्ता गेलो तरंच परत जाण्यात अर्थ आहे."
"म्हणजे?"
"अरे, सुदैवाने तिला दोन्हीकडचे आजी-आजोबा आहेत अजुन! आपण इथे राहून त्यांना तिचा आणि तिला त्यांचा सहवास कसा आणि किती मिळणार? म्हणूनच मला परत गेल्यावर मुळी नोकरी करायचीच नाही… केली एवढी बास झाली. आता मला आपल्या दोघांच्या आई-बाबांचं बघणं, विपूला वाढवणं - पुन्हा एकदा लहान होऊन तिच्याबरोबर खेळणं, मस्ती करणं, हेच करायचंय. तिचा एकही माईलस्टोन मला मिस् करायचा नाहिये."
"वसु - किती दिवसांनी एवढं हळवं झालेलं बघतोय तुला! काय झालं राणी?"
"अरे, जे सुख आपल्या नशीबात नाही असं आपण गृहीत धरलं होतं ते आता पदरी आल्यावर मला भरभरुन अनुभवायचंय, पुन्हा एकदा आपल्या मुलीबरोबर आपलं बालपण जगायचंय…"
"हं… तू म्हणते आहेस ते सगळं पटतंय मला. फक्त प्रश्न नोकरीचा आहे. आता चाळीशी उलटून गेल्यावर नव्याने सगळं बस्तान बसवायचं, इथलं सगळं मोडून - नाही म्हटलं तरी थोडं कठीण वाटणारंच ना! लग्नाला जेमतेम वर्ष होत नाही तो आपण इथे आलो! आपण जातो खरं भारतात, पण दर खेपेला ओळखीच्या खुणा हळुहळु कमी-कमी झालेल्या दिसतात. आणि आपल्या डोक्यात असलेला आपण सोडतानाचा भारत, तिथली माणसं, दुकानं - इतकंच कशाला वस्तुंचे भावसुद्धा - आता आपल्या कल्पनेच्या पलिकडचं आहे सगळं. जमेल आपल्याला जुळवून घ्यायला नव्यानी?"
"सुभाष, या सगळ्या गोष्टी तर आपण इथे आलो तेव्हाही खऱ्या होत्याच की! सगळं नवीन होतं, शिवाय सांगायलाही कोणी ओळखीचं नव्हतं जवळ…"
"हो, पण आपण तेव्हा पंधरा वर्षांनी तरुण होतो, उराशी काही स्वप्न होतं."
"आताही आपल्या उराशी स्वप्न असणारच आहे की! आपल्या मुलीला आपल्या देशात लहानाचं मोठं करायचं, आपल्या आई-बाबांची म्हातारपणची काठी व्हायचं. एकदा काही तरी ध्येय आपल्यासमोर असलं, आपण का परत जातोय याचा नीट आणि पूर्ण विचार करुन गेलो तर बाकीचे प्रश्नही सुटतीलच."
शेवटी, वसुंधराने सुभाषचं मन वळवलंच. स्वप्ना आणि प्रसादचा इथेच राहण्याचा विचार दिसत होता. त्यामुळे सुभाषला वसुचं म्हणणं पटायला जास्त जड गेलं नाही. सुदैवाने सुभाषची ह्यूस्टन ऑफिसमधली जनरल मॅनेजरची पोस्ट बी.पी.च्या मुंबईच्या ऑफिसमध्येही कायम राहिली, त्यामुळे त्याचा उरला-सुरला विरोधही संपला. सगळं काही इतक्या पटापटा झालं की "आम्ही परत जायचा विचार करतो आहोत" असं स्वप्ना-प्रसादला सांगून आठ-दहा दिवस होत नाहीत तोच सगळं आवरंतही आलं! निघायच्या आधी त्यांना भेटायला तिघेही शिकागोला गेले. सकाळी पोहोचून संध्याकाळी भारतात येणारं विमान गाठायचं असं ठरवून; पण स्वप्नाने मुळी सोडलंच नाही त्यांना. हसत-खेळत दोन दिवस कसे गेले, कळलंही नाही! विमानतळावर पोहोचल्यावर चेक-इन करुन झालं आणि आता मात्र खरंच निरोप घ्यायची वेळ आली. सगळ्यांनाच जड जात होतं. पण इलाज नव्हता.
आठवणींत हरवलेली वसुंधरा एकदम भानावर आली ती बेडरुमच्या दाराशी कोणीतरी रडत असल्याचा भास झाला म्हणून. तिनी सुभाषला हळूच हलवलं तर त्याला केव्हातरी झोप लागली असावी. त्यामुळे हलकेच सुभाषचं डोकं मांडीवरुन खाली ठेवलं, आणि हळूच उठून बेडरुमचं दार उघडलं - तर भिंतीला टेकून विप्लवि हमसाहमशी रडत होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा